पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर फेरले पाणी, पिकांचे मोठे नुकसान

Shares

खरीप हंगामात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामी पिकांकडून अपेक्षा होती. मात्र पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे असे म्हणता येईल. यावेळेस निसर्गाने संपूर्ण नियोजन बिघडवण्याचेच ठरवले आहे असे वाटत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कवडीमोलाने देखील उत्पन्न मिळाले नाही. आता रब्बी हंगामात काही पिकांचे चांगले उत्पादन होणार असे दिसून येत होते. मात्र शेतात भाजीपाला बहरत असतांना, तुरीची काढणी सुरु असतांना गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले असून या गारपीठामुळे सर्वाधिक नुकसान वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. या पावसामुळे भाजीपाल्याच्या वाफ्यामध्ये पाणी साचले असून मेथी, पालक, कोथिंबीर पीक पाण्यात गेले आहे. एवढेच काय तुरीच्या शेंगा तर चक्क चिखलाने भरल्या असल्यामुळे त्यांची काढणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

वाशीम जिल्ह्यात झाले सर्वाधिक नुकसान
हवामान खात्याने वाशीम जिल्ह्यात पावसाचा अंदाज दर्शवला होता. मात्र अंदाजापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस वाशीम जिल्ह्यात पडला आहे. वाशीम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी तर काही ठिकाणी गारपीठ पडले आहे. त्यामुळे पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामात फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत अश्यात आता पुन्हा गारपीट,पाऊसामुळे झालेले नुकसान तर वेगळेच आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेईल, नुकसान भरून देईल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सरकारकडे मदतीची मागणी
काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळीचा सर्वात मोठा फटका फळबागायतदारांना बसला होता. त्यावेळेस राज्य कृषीमंत्रीने ८ दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले असतांना देखील अजूनही या आदेशाचे पालन झालेले नाही. त्यात आता पुन्हा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आता गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *