पावसाळ्यात शेवगा लागवड करताय ? मग ही घ्या काळजी !
शेतीच्या विविध प्रकारांपैकी कोरडवाहू प्रकार हा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. या प्रकारामध्ये विविध पिके लावली जातात ज्यात अगदी सहजपणे “शेवगा लागवड” देखील केली जाते. कमी पाण्यावर देखील चांगल्याप्रकारे येणाऱ्या शेवगा लागवडीसाठी साधारण प्रकारची जमीन देखील पूरक ठरते.
जास्त आर्द्रता असताना शेवगा लागवडीचा काळ योग्य ठरतो, जसे पावसाळा सुरु होण्याच्या दरम्यानचा काळ.
या काळात लागवडीची वाढ चांगली होते.
पावसाळ्यामध्ये शेवगा पिकाची काळजी आणि महत्वपूर्ण बाबी :-
हे लक्षात ठेवा :-
• पाणी साचून राहणाऱ्या शिवारामध्ये किंवा साचलेल्या पाण्याला वाट काढून देणे अशक्य असेल, अशा शिवारात शेवगा लागवड करणे टाळावे. कारण शेवग्याच्या मुळांजवळ सतत ओलसरपणा राहिला तर मुळांना बुरशी लागून ती कुजून जायला सुरुवात होते आणि हळूहळू पाने पिवळी पडून पानगळीस सुरुवात होते.
• पीक खराब होऊन मरु नये यासाठी शक्य तेवढ्या लवकर उपाय करावे.
• पावसाळ्यात किंवा पावसाच्या अगोदर शक्यतो पंजा छाटणी करून घेणे महत्त्वाचे असते. जेणेकरून पावसाच्या महिन्यात फुटवे फुटून त्यांचे फांदीत रूपांतर होईपर्यंत पावसाचा कालावधी निघून जातो आणि नंतर फुलधारणा होऊन उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहेत.
• पावसाळ्यात बुरशी सोबतच फळ माशी, मावा, खोडकीड, हुमणी, पाने गुंडाळणारी तसेच पाने खाणारी अळी इत्यादी किटकांचा प्रादुर्भाव दिसतो.
अशी घ्या काळजी :-
• पावसाळ्याच्या सुरुवातीला आवश्यक ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करावी.
• शिवारातील साचलेल्या पाण्याला वाट करून द्यावी म्हणजे पुढील धोका टळून जाईल.
• आवश्यकतेनुसार प्रकाश सापळे लावावेत ज्यामुळे पतंग अवस्थेतील कीटकांचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकेल.
• खोडकिडीवर मात करण्यासाठी खोडाजवळील आणि भोवतालचे तण काढून घ्यावे.
• पावसाच्या जोरामुळे लहान झाडांना आधार म्हणून खोडाजवळ मातीचा मुबलक भर द्यावा.
• आठवड्यातून किमान एकदा बुरशीनाशक व ह्युमिक ऍसिड ड्रिप द्वारे द्यावे किंवा त्याची आळवणी करावी. त्यासोबतच बुरशीनाशकाची देखील फवारणी करावी.
• पावसाचा खंड पडला असले तर झाडांचे पोषण टिकून राहण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्ये ड्रीप द्वारे द्यावीत.
• पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी आठवड्यातून एकदा ड्रीपद्वारे गोमूत्र, गुळ गांडूळ पाणी दिल्यास चांगला परिणाम बघायला मिळतो.
अशाप्रकारे कोरडवाहू भागात घेतल्या जाणाऱ्या शेवगा लागवडीचे योग्य व्यवस्थापन करता येते, ज्यामुळे कमी खर्चात आणि अल्प मेहनतीमध्ये या पिकाची चांगलीच वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क