रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन

Shares

पिकांना आपण जेवढे अधिक पाणी देऊ तेवढी पिके तरारतील, असे अनेक शेतकऱ्यांना वाटत असते. मात्र हे वास्तव नसून पिकांना जेवढी गरज असते, तेवढेच पाणी देणे इष्ट ठरते.
रोपांना गरजेपेक्षा अधिक घातलेले पाणी जमिनीत खूप खोलवर जाते आणि रोपांची मुळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. गरजेपेक्षा अधिक पाण्याची वाफही होऊन उडून जाते.

रब्बी पिकांच्या बाबतीत सिंचनाच्या दोन तृतीयांश पाणी कच्च्या पाटातून येत असताना जमिनीत शोषले जाऊन नष्ट होते. केवळ एक तृतीयांश पाणीच रोपांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे जर सिंचन योग्य वेळेत केले गेले तर सीमित पाण्याचा योग्य उपयोग होतो.

योग्य वेळी आणि प्रमाणात सिंचन करावे

अधिक सिंचन केल्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. सिंचन वेळेवर केल्यास लाभ होतात; पण गरजेपेक्षा जास्त पाणी दिले गेल्यास रोपांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये जमिनीत मुरून खोलवर जातात. ही द्रव्ये रोपांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच रोपे पिवळी पडू लागतात.

ज्या ठिकाणी पाटाने पाणी दिले जाते, तेथे वारंवार हे द़ृश्य पाहायला मिळते. अधिक सिंचन केल्यामुळे मातीत हवेचा संचारही कमी होतो. त्यामुळे रोपांची वाढ खुंटते. जमिनीतील क्षार अती प्रमाणात पाणी दिल्यामुळे वाढतात.

त्यामुळे जमीन क्षारपड होण्याचा धोका वाढतो. अधिक ओलावा असल्यामुळे जमिनीत रोपांच्या मुळांचे क्षेत्र घटते. त्यामुळेच रोपांना पुरेशा प्रमाणात जमिनीतील पोषक तत्त्वे शोषून घेता येत नाहीत.

रब्बी हंगामातील गहू पिकाचे पाणी व्यवस्थापन

रब्बी हंगामातील गहू हे प्रमुख पीक आहे. याच पिकाला अधिक सिंचनाचा लाभ होऊ शकतो. देशी उन्नत जातींचा गहू किंवा गव्हाचे सुधारित वाण लावल्यास पाण्याची आवश्यकता २० ते ३० सेंटी मीटर एवढी असते. या जातींमध्ये पाण्याच्या उपयोगाच्या दृष्टीने तीन अवस्था असतात.

पेरणीनंतर ३० दिवसांचे पीक झाल्यानंतरची अवस्था, पुष्पावस्था म्हणजे पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनंतरची अवस्था आणि दुधिया अवस्था म्हणजे पेरणीनंतर ९५ दिवस पूर्ण झाल्यानंतरची अवस्था अशा या तीन अवस्था आहेत.

या तीन अवस्थेत पाणी दिल्यास पिकाचे उत्पादन वाढते. प्रत्येक सिंचनावेळी ८ सेंटी मीटर पाणी दिले जाणे आवश्यक आहे. बुटक्या गव्हाच्या प्रारंभिक अवस्थेपासूनच पाण्याची आवश्यकता अधिक असते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *