शेतकरी आता होणार मालामाल, ७ वर्षानंतर ‘रेशमी’ दिवस
अनेक शेतकरी आता शेतीबरोबर जोडधंदा देखील करत आहेत. यामध्ये कित्तेक शेतकऱ्यांचा कल हा रेशीम शेतीकडे आहे. कोरोना काळात रेशीमचे दर हे एकदम उतरले होते. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता हे चित्र बदलतांना दिसत आहे.
रेशीम शेती एक एकरात असो किंवा तीन एकरात सर्वच रेशीम उत्पादक लाखों रुपयांची कमाई करत आहेत. तब्बल ७ वर्षानंतर रेशीम कोसाचे दर वाढले आहेत.
रेशीम कोसास सध्या ८०० रुपये ते ९०० रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे आता रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे रेशमी दिवस आले आहेत असे म्हणता येईल.
रेशीम उत्पादनात परभणी चौथ्या क्रमांकावर
केवळ परभणी जिल्ह्यात तब्बल २०० ते २५० हेक्टरवर शेती केली जाते, ज्यातून जवळपास ३०० टन रेशीम कोष उत्पादन होते, ज्यामुळे राज्यात परभणी रेशीम उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोना काळात शेतकऱ्यांनी जोपासलेल्या या रेशीम कोसचे भाव हे १५० रुपये प्रति किलोपर्यंत आले होते. मात्र सध्या याला सोन्याची किंमत मिळत आहे.
रेशीम उत्पादक शेतकरी आता मालामाल
जालना, कर्नाटक आदी ठिकाणी ८०० ते ९०० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. त्यातही कोसची प्रतवारी चांगली असेल तर ९२० ते ९५० रुपयांपर्यंत भाव मिळतोय. त्यामुळे एक एकर असो कि अडीच एकर सर्वच रेशीम कोस उत्पादक शेतकरी लाखांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत.
त्यामुळे तब्बल ७ वर्षांनी रेशीम कोसचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. रेशीम कोसला चांगला भाव मिळाल्याने कोरोना कालखंडानंतर भाववाढीने शेतकरी मालामाल झाले आहेत
रेशीम गुणवत्ता चाचणी केंद्र सुरु?
मराठवाड्यामध्ये सुरुवातीला केवळ जालना आणि बीड मध्ये रेशीम शेती केली जात होती. आता मात्र रेशीम शेतीचे महत्व तसेच कृषी विभागाने दिलेले योगदान पाहता मराठवाड्यामध्ये रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले आहेत.
खरेदी केंद्राच्या माध्यमातून जालना आणि बीड ला बाजारपेठ उपलब्ध झाली होती मात्र रेशीम कोषाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यास थेट कर्नाटकला पाठवावे लागत होते. परंतु आता जालन्यातील खरेदी केंद्रावरच रेशीम गुणवत्ता चाचणी सुरु होणार आहे.