जाणून घ्या शेतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या पालाशचे महत्त्व

Shares

जर्मन शास्त्रज्ञ जस्टस लेबिग याने प्रयोगशाळेत वनस्पती जाळून राखेचे परीक्षण केले तेव्हा, त्यात त्याला नत्र, स्फुरद, पालाश हे तीन घटक आढळले. तेव्हापासून या तीन घटकांचे वर्गीकरण हे ‘शेतीसाठी अत्यावश्यक घटक’ या प्रकारात झाले. नत्र, स्फुरद, पालाश संस्कृतीचा जनक म्हणून जस्टस लेबिग यांना ओळखले जाते. वनस्पतीमध्ये कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही. सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघांबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे करतात. स्फुरद हा उत्पन्न ठरविणारा घटक आहे, तर पोटॅश हा शेती उत्पादनाची गुणवत्ता ठरविणारा घटक आहे. उत्पादनाची चव, रंग, तजेला, टिकाऊ क्षमता हे गुण मुख्यतः पोटॅशच्या उपलब्धतेवर ठरतात. म्हणजे स्फुरद व सिलिकॉन हे दोघंही इमारतीच्या पायाच्या दगडाप्रमाणे काम करतात, तर पोटॅश हा कळस चढवितो. पालाश व सिलिकॉन यांची कामे, विशेषतः ताण नियोजनाच्या कामात सारखी आहेत. सिलिकॉन कायम अप्रत्यक्षपणे कामे करतो, तर पालाश प्रत्यक्ष पिकाच्या वाढीतील महत्त्वाचा घटक आहे.

पालाशचे महत्त्व :-

१. पालाशमुळे पिकातील साखर वाढून उत्पादनात वाढ होते.
२. लोहासारख्या जड धातूचे चलनवलन सुव्यवस्थित होते.
३. पालाशमुळे कार्बोहायड्रेट्‍स-साखर तयार होते. पण प्रथिने तयार करण्यातही त्याचा वाटा आहे.
४. पिष्टमय पदार्थांच्या घडणीबरोबरच विघटनाची क्रियासुद्धा मार्गी लागते. या विघटनातूनच पिकाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा मुक्त होते.
५. पीक फुलावर येण्यासाठी तसेच फळधारणेसाठी लागणारी जैवरसायने तयार होण्यासाठी पालाश अत्यावश्यक आहे.
६. जवळ-जवळ ६० प्रकारच्या विकरांच्या क्रियांना चालना मिळते. त्यामुळे चयापचयाची क्रिया सुनियंत्रित होते.
७. रोगांचा प्रादुर्भाव, कमी पाणी आणि तापमानातील बदल यामुळे पिकावर येणाऱ्या तणाला तोंड देण्यासाठी पालाश व सिलिका अतिशय प्रभावी ठरतात.
८. पालाशची पिकामधील उपलब्धता मुख्यतः लोहाच्या देवाण-घेवाणीतून होत असते. पालाश पिकामध्ये होणाऱ्या चयापचयाच्या क्रियांचे नियंत्रण करतो.
९. प्रकाशसंश्लेषण क्रियेत या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे. अपुऱ्या पालाशमुळे श्वसनाची गती वाढते. प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. त्यामुळे पिकाच्या विविध भागांकडे कार्बोहायड्रेट्‍सचा पुरवठा कमी होतो.
१०. पालाशमुळे पेशींमधील विविध आयन्सचे योग्य संतुलन राखले जाते.

पालाशच्या उपलब्धतेमुळे पीक सहन करते ताण :-

१. दुष्काळी परिस्थितीत पानांमागे असणारी पर्णरंध्रे बंद राहणे व पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होऊन पिकाच्या शरीरात जास्त काळ पाणी टिकण्यामध्ये पालाश मदत करते.
२. पेशी आवरणाची स्थिरता, मुळांची वाढ, पानांचा आकार, तसेच पिकाचे एकूण वजन दुष्काळी परिस्थितीतही वाढविण्यासाठी पोटॅशची गरज असते.
३. पालाशची कमतरता असेल तर क्षाराचा ताण सहन करायची पिकाची शक्ती कमी होते. कारण या ताणाच्या काळात पिकामध्ये नत्र व प्रकाशसंश्लेषणात कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेण्यात अडथळे निर्माण होतात.
४. थंड हवामानात जर पिकात पालाशची कमतरता असेल तर पीक गारठलेल्या अवस्थेत जास्त पाणी उचलू शकत नाही. पेशींमध्ये कोरडेपणा येतो.
५. पालाशची कमी व सोडियमचे अधिक प्रमाण याने पेशीद्रव्यातील K+/Na+ यांचे गुणोत्तर कमी होते. त्याचा परिणाम मुळांतील लोहाच्या देवाण-घेवाण शक्तीवर होतो.

अशाप्रकारे पालाश हा घटक शेतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्याचा योग्य वापर शेतजमिनीला लाभदायक ठरतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *